फॉलोअर

मंगळवार, ९ मार्च, २०२१

माझा भारत,माझी सुरक्षा



माझा भारत,माझी सुरक्षा
प्रश्न पडलाय मला ,माझा भारत माझी सुरक्षा - देशाची सुरक्षा का देशातल्या मुलींची? 
हल्लीच्या दिवसातील महत्वाचा मुद्दा म्हणजे स्ञी-सुरक्षा. ज्या भारतभुमीने माझ्यासारख्या मुलींना, महिलांना समानतेचा हक्क मिळवुन दिला, साविञीबाईच्या अथक प्रयत्नातुन दर्जेदार शिक्षणाचीही हक्क मिळवुन दिला, स्ञीयांना सन्मानाची वागणुक दिली, अहो एवढेच नाही तर भारतातील महत्वाची कार्यप्रणाली म्हणजेच निवडणुक प्रक्रिया तिथेही प्रयत्नांची पराकाष्टा करत, सर्वप्रथम भारतीय स्ञी वर्गाला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिला, त्याच आपल्या महान राष्ट्रात स्ञियांमध्ये असुरक्षिततेची भावना का बरं निर्माण व्हावी?

निर्भया सारख्या कित्येक मुली रोज या अशा विचिञ घटनांना बळी पडता आहेत. त्याची तर गणतीच होवु शकत नाही. रोज वर्तमान पञात अशा घटना वाचताना मन अगदी हेलावुन जाते व मनात प्रश्नांचे काहूर उठू लागतात. आज ही मुलगी आहे, हिच्या जागी उद्या मी तर नसेल?मी उद्या एकटीच बाहेर पडले व माझ्या मागे कुणी आलं तर? असा पेचप्रसंग माझ्यावर ओढावला तर? माझं काय होईल? लोक माझी साथ देतील?  माझ्यावर झालेला अन्याय समजुन घेतील? का मलाच या सर्वात दोष देवुन मोकळे होतील? असे अनेकानेक प्रश्न माझ्या मनात आपोआप निर्माण होतात व आपोआप सकारात्मक विचारांची जागा नकारात्मक विचार घेतात व अशा घटना एकुण एक क्षण जसं मन चीडीने, रागाने, द्वेषाने पेटुन उठतं तसंच त्याच घटनेनं भयभीतही होतं. 125 कोटी जनसमुदायाचा हा देश जिथे माय, बहीण, लेकी, सुना सुरक्षित नाही, त्या देशाच्या सिमासुरक्षा मग कितीही दणकट करा काही फायदा नाही. ज्या देशात आपलेच लोक अतिरेक्यांसारखे मुलींवरती वाईट नजरा टाकतात व त्यांचा फायदा उचलतात तो देश दुसऱ्या देशातील अतिरेक्यांना मारतोय व सिमासुरक्षा चोखपणे बजावतोय. अरे निदान ते अतिरेकी तरी समोर येवुन युध्द करतात. एक तर मारतात किंवा मारले जातात पण या आतल्याचं काय करावं, ते गुन्हे तर करतात पण निर्लज्यासारखे काहीही न करता छातीठोकपणे फिरतात. ज्या नराधामांवर खरी कारवाई व्हायला हवी त्यांच्यासाठी दुर्देवाने आपले देशात त़्यांना जोम बसेल असा कायदा नाही. अरे जेव्हा निर्भयासारख्या निष्पाप मुलीचा या अत्याचारातुन बळी गेला तेव्हाच जर कडक पावले उचलली असती तर असले घाणेरडे खुळ थोड्या प्रमाणात का होईना कमी झालेच असते, पण कायदा माञ परवानगी देत नाही. आपण फक्त तारखांची वाट बघावी.  निर्भयाच्या मारेकाऱ्यांच्या निकालाला विलंब झाला, त्यांना जेव्हा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली खरच  तेव्हा प्रत्येक मुलीला आश्चर्याचाच धक्का बसला असावा नाही का!  त्या मुलीचा जीव गेलाय तरीही कायद्याच़्याबाजुनेच चाला ,मग तो योग्य असो वा नसो.


बरं असे गुन्हे का घडतात? यावर कधी विचार केलाय? नकळतपणे मुली अशा घटनांना का बळी पडतात?  याबाबतीत तर आपल्या जनमानसात जनजागृतीच नाही. खुप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या या गोष्टी घडण्यास प्रोत्साहन देतात; त्यात प्रामुख्याने व्यसनाधिनता, वाईट सवयींच्या आहारी जावुन या गोष्टी घडतात. मोठमोठ्या  शहरात पब, पार्ट्या, सट्टेबाजी अशा अनेक माध्यमातनं ह्या गोष्टी सर्रास चालु असतात. तिथेच मोठ्याप्रमाणात या गोष्टी घडतात. यातील मी मिळविलेल्या माहितीनुसार इथे चालणारा  एक सगळ्यात महत्वाचा वाईट प्रकार म्हणजे date rafe. मुलींना डेट वर घेवुन जायचं, तिथे एक विशिष्ट द्रव्य असते ते जर एक थेंब जरी मुलीच्या पेयामध्ये मिसळलं तर  त्या मुलीची स्मरणशक्ती, मेंदुच्या विचार करण्याच्या नसा अशा प्रकारे block होवून जातात की तिची तिलाच शुद्ध नसते व सकाळपर्यत त्या मुलीचं आयुष्य बरबाद झालेलं असतं. किती वाईट ना! अशाच द्रव्यांचा चुकीच्या पध्दतीने का होईना आपल्या देशात पुरवठा सुरूच आहे. असही काही असतं हे ऐकुणच मन सुन्न व्हायला लागतं. मग एवढ्या संधी असुनही या असल्या घाणेरड्या नजरांमुळे प्रसंगी पालकही मुलींना मागे खेचतात. काही मुली काहीतरी करून दाखवण्याच्या ईच्छाशक्तीने मोठ्या हिमतीने बाहेर पडतात पण अशा घटनांना सामोरे जाण्याच्या भीतीने परत त्यांचे पाय आपोआप मागे ओढले जातात.
 
खरच या बाबतीत अतिशय सखोल विचार करण्याची व कठोर पावले उचलण्याची नितांत गरज आहे. स्ञी ची इज्जत, तिची अब्रु, तिचा स्वाभिमान, तिची जिद्द आणि तिची धडपड हे सर्व अग्रगण्य असायला हवं. कारण आज ती उभी आहे म्हणुनच हे जग उभे आहे. निर्मिती आणि उन्नतीची संरचना म्हणजेच 'स्ञीशक्ती'! तिच्या एवढी ताकद या समस्त मानवजातीत कुणाकडेच नाही. परंतु आपली संस्कृती माञ 'चुल आणि मुल' या संकल्पनेतुन तिला दुय्यम स्थानी खेचते. खरं तर इथे सखोल मनन केले तर संस्कृतीलाही दोष देता येणार नाही. तिने काही अटी शर्ती लागु केल्यात ना त्या, त्या काळातील परिस्थितीनुसार तेव्हाही स्ञी- पुरूषांना समान हक्क होते पण; त्याच संस्कृतीचा चुकीच्या पध्दतीने अर्थ काढुन स्ञियांवरील अत्याचार वाढता आहेत. संस्कृतीचा आधार घ्या पण तो समजुन घ्या, त़्यातील अशा गोष्टींचा स्वीकार करायला हवा , ज्या गोष्टी योग्य दिशा देतात. 

याच काही अनिष्ट चालिरितींमुळे अजुनही मागासलेला काही समाज कौटुंबिक कलहात बुडुन चाललाय. तिथुनच खरी स्ञियांमध्ये  असुरक्षिततेची भावना निर्माण होते.  
परिस्थिती बदलायची असेल तर आपला पायाच आपल्याला भक्कम करावा लागेल. ज्या दिवशी मी, आणि माझ्या देशातील स्ञी ताठ मानेनं बलात्कारमुक्त, गुन्हेगारीमुक्त अशा भारत देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात बिनधास्त वावरू शकेल ना तेव्हाच मी म्हणेल.....
हाच माझा भारत देश! ज़्यात मी सुरक्षित आहे
हाच माझा  भारत देश! जिथे स्वच्छंदी मनाने स्वप्नांच्या दिशेने भुरक् न भरारी मी घेवु शकेल
हाच माझा भारत  देश! ज्याने स्ञियांची सुरक्षा अग्रस्थानी मानुन अत्याचारांनासारख्या गलिच्छ गोष्टींना आळा बसवला.
आवडेल मला आणि माझ्या सर्व स्ञीजातीला माझ्या देशातील या किर्तीचे जगभर कौतुक करायला. पण ही वेळ येणार केव्हा? स्ञी सुरक्षा कायदे उपाययोजना फक्त कागवरच राहणार का येणार कधीतरी त्या संसद भवनाच्या, न्यायालयाच्या बाहेर? आज आपला भारतदेश सर्वच क्षेञात भरीव कामगिरी करतोय. अगदी चंद्रावर पोहोचेपर्यंत मजल गेलीय आपल्या शास्त्रज्ञांची इथेही महिला आहेतच, ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट!

विषय हा येतो की जर सर्वच क्षेञात प्रगती होऊ शकते, आपले सरकार जर या सर्व गोष्टींमध्ये भारताला अग्रस्थानी आणु शकते तर मग जेव्हा स्ञियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा का विविध प्रकारचे तंत्रज्ञान उदयास येत नाही? आपल्या देशाची IT सिस्टिम खुप पुढे गेली आहे़, ताकद आहे ना आपल्या भारतातील शिक्षित पिढित की ते अशी यंञणा प्रस्थापित करू शकतील की ज्याने या गुन्हेगारी विश्वाला कायमचा आळा बसेल अशी यंञणा जी कोणताही अतिरेकी काय जगातली कोणतीही सुरक्षा व्यवस्था तोडु शकणार नाही.
  नुसती 'मुलगी,शिकली प्रगती झाली', 'पहिली बेटी,धनाची पेटी', 'मुलगी वाचवा...' इ. इ. या घोषणा देताना आपल्या मनात हा ही विचार आला पाहिजे की जन्म घेणाऱ्या त्या 'लक्ष्मीरूपी पावलांना' या जगात सुरक्षित आयुष्य कसं मिळेल. त्यांच्या आयुष्याला गालबोट लागेल अशा रूढी परंपरा, अरिष्ट चालिरिती व माणसातील वाईट विचारसरणीतुन उद्युक्त झालेला राक्षस कसा नष्ट होईल? हा असा विचारमंञ माझ्या देशातील जनमानसात रूजेल ना तेव्हा मी म्हणेल 
                  माझा भारत, सुरक्षित भारत!

काही दिवसांपुर्वी काही ओळी वाचण्यात आल्या होत्या, त़्या इथे योग्य लागु पडतात असं मला वाटतं. हिंदीतल्या त्या ओळी...

'कोई भी देश तरक्की के शिखर पर तब तक नही पहुंच सकता जब तक उसकी महिलाएं कंधे से कंधा मिलाकर ना चले'!

मला वाटतं या 3 ओळीतच मी काय सांगायचा प्रयत्न करतेय हे तुम्हाला उमगलच असेल.....

आपली मातृभुमी ही सर्व सोयी-सुविधांनी सुजलाम् सुफलाम् आहे परंतु ती नियोजनबद्ध असायला हवी ना! तिथे कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटतयं. यातुनच वाईट कृत्यांचा उदय होतो. योग्य ती माणसे जर आपल्या देशाच्या नियोजन प्रक्रियेत असली ना तर देशाचा सदैव जयच होईल आणि अत्याचार विश्वाला ही आळा बसेल.
म्हणुनच मी म्हणते ज्या वेळी देशातील प्रत्येक स्ञी सुरक्षित असल्याचं ती स्वत: समजेल ना त्या वेळी आपला भारत देश सर्व नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत किती तरी पुढे गेलेला असेल!

चला चला हो चला चला 
अश्या मातृभुमीकडे चला चला जिथे स्ञी शक्तीची इज्जत हो
कोणतीच मायबहिण आमुची बेइज्जत ना हो
भारत माते जननी आमुची 
तुच रक्षिणी या धरतीची
गंगा ,सरस्वती ,यमुनासम ह्या छवी पावन 
या स्ञी शक्तीची
मोड मान या मी युक्त गुन्हेगार राक्षसाची
पुन्हा निर्माण कर मनामनात भावना सुरक्षितेची!

अख्या जन्माचं मुळ म्हणजे स्ञी, तिचा महिला दिना पुरताच नाही तर रोज आदर व सन्मान करा आणि तिला सुरक्षितता वाटेल असच वातावरण निर्माण करा, ती खुलेल तिच्या मनाच्या विश्वातुन!
                             
                          ✒प्राची नाईक उंडणगावकर✒

४ टिप्पण्या:

लग्नसराईत लपलेला धोका: वर्धा लव्ह जिहाद स्टोरी

लग्नसराईत लपलेला धोका: वर्धा लव्ह जिहाद स्टोरी लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वांगसुंदर असा प्रसंग असतो. सध्या उन्हाच्या तडाख्यातही लगी...